फडणवीसांच्या मागण्यांसाठी राज्यपाल आग्रही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले पत्र
विधान परिषदेच्या 12 आमदारांच्या निवडीसाठी महाविकास आघाडीकडून वारंवार पाठपुरावा करूनही त्यावर निर्णय न घेणाऱया राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मागण्यांवर अवघ्या आठवडाभरात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. फडणवीसांनी मांडलेले विषय महत्त्वाचे असून त्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती मला द्यावी, असे राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेऊन पावसाळी अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांपुरता मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 23 जून रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी राज्यपालांना निवेदन देत विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीत वाढ करावी, नाना पटोले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेले विधानसभेचे अध्यक्षपद तातडीने भरण्यात यावे, ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित असल्याने सध्याच्या परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत, अशा तीन मागण्या त्यांनी राज्यपालांकडे केल्या होते. विरोधी पक्षाच्या या निवेदनाची तत्काळ दखल घेत राज्यपालांनीही थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. फडणवीसांनी मांडलेले तिन्ही विषय महत्त्वाचे आहेत. त्याबाबत आपण योग्य ती कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीची माहिती मला द्यावी, असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.