मुद्दा – भूगर्भतज्ञांचा सल्ला घ्या
>> ज्ञानेश्वर भि. गावडे
मुंबई शहराचा विकास व संवर्धनासाठी अधिक गती व जागा उपलब्धता व्हावी म्हणून 2014-2034 चा विकास आराखडा मुंबई महापालिकेने नुकताच सादर केलेला आहे. वाढत्या दाट वस्तीचा सध्याच्या मूलभूत सोयी व सुविधांवर पडणारा ताण नियंत्रित करण्यासाठी तिप्पट वस्ती सामावणारा विकास आराखडा प्रत्यक्षात येणार आहे, कारण येत्या वीस वर्षांत वाढणाऱया गर्दीसाठी 58 टक्के जमिनीवर साडेतीन आणि 32 टक्के जमिनीवर पाच एफएसआय (वाढीव बांधकाम क्षेत्र) सूचित केलेला आहे. त्याशिवाय, वाढत्या रोजगारनिर्मितीसाठी रेल्वे स्टेशनच्या परिसरात 6 पासून 8 पर्यंतचा एफएसआयचा पर्याय ठेवलेला आहे. त्या सर्वांसाठी प्रशासकीय मंजुरी सहज व सोपी ठेवलेली आहे.
परंतु मुंबईच्या भूपृष्ठावर सोय करताना भूपृष्ठांच्या खाली वाढत्या भूभारामुळे जो धोका निर्माण होणार आहे, त्याचा विचार व्हायला हवा. वस्तुतः मुंबई आणि मुंबईचा परिसर पश्चिम घाटाच्या कुशीत वसलेला आहे. लाव्हारसाने तयार झालेला हा भूस्तर असल्यामुळे सागरी हालचालीने या भूस्तराची मोठी धूप होत असते, त्यामुळे सागर किनाऱयावर धोकाप्रवण घटकांमध्ये वाढ होते आणि त्यातूनच भूकंपाची तीव्रता वाढू शकते. म्हणूनच लाव्हारसाने बनलेले मुंबईचे दख्खनी पठार अलीकडच्या काळात सक्रिय झालेले आहे. 1841 ते 1960 या 120 वर्षांत 5.16 रिस्टर क्षमतेने फक्त 13 भूकंप नोंदले गेले आहेत. मात्र नंतरच्या 1991 ते 2003 या अवघ्या 42 वर्षांत 6 रिस्टर क्षमतेचे तब्बल 62 भूकंप नोंदले गेले आहेत. कोयना व किल्लारीचे उदाहरण घेऊ याच काळातले, तद्नंतरच्या नोंदीही तशाच गंभीर असण्याची शक्यता आहे. त्याशिवाय वारंवारची त्सुनामी वादळे समुद्राला धडके देणारी आहेतच. म्हणून मुंबईचा परिसर अधिक भारग्रस्त होण्याची वस्तुस्थिती लक्षात घेता, मुंबईच्या भूपृष्ठाखाली ताज्या भूकंपप्रवणतेचा विचार गांभीर्याने केला पाहिजे.