महाराष्ट्राची केंद्र सरकारकडे दीड कोटी लसींची मागणी
महाराष्ट्राची लसीकरणाची क्षमता आणि वेग पाहता कोरोना प्रतिबंधक लसींचे दीड कोटी जादा डोस पुरवले जावेत, अशी मागणी आरोग्य विभागाने केंद्र सरकारकडे केली आहे. जुलै महिन्यात रोज 10 ते 12 लाख लोकांचे लसीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले असून तो आकडा 15 लाखांवरही जाऊ शकतो असे आरोग्य विभागाने केंद्राला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
आरोग्य विभागाचे अतिरिक्त सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव राजेश भूषण यांना हे पत्र पाठवले आहे. केंद्र सरकारकडून जुलै महिन्यात देशात कोरोना लसींचे 12 कोटी डोस वितरीत केले जाणार आहेत. त्यातील 1 कोटी 15 लाख डोस महाराष्ट्राला देण्यात येणार आहेत. रोज साधारणपणे 3 लाख 70 हजार डोस उपलब्ध होणार आहेत. मात्र राज्याची लसीकरणाची क्षमता त्यापेक्षाही तिप्पट आहे. लसीकरणाच्या बाबतीत देशामध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, असे या पत्रात नमूद करण्यात आले आहेत.
लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागतात
महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. प्रत्येकाला दोन डोस याप्रमाणे 24 कोटी डोसची गरज आहे. आतापर्यंत 3 कोटी 30 लाख नागरिकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. वेळेवर लस पुरवठा होत नसल्याने अनेक भागांमधील लसीकरण पेंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे महाराष्ट्राला लसींचे जास्तीत जास्त डोस मिळाले पाहिजेत असे आरोग्यतज्ञांचे मत आहे.
– आतापर्यंत 3 कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहे. 26 जून रोजी एकाच दिवशी 7 लाख 38 हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले होते, अशी माहितीही या पत्रात डॉ. व्यास यांनी दिली आहे. राज्यात सध्या पुरेशी लसीकरण केंद्रे आहेत. तिथे दिवसाला सुमारे 12 लाख नागरिकांचे लसीकरण केले जाऊ शकते. केंद्र सरकारकडून जादाचे दीड कोटी डोस मिळाले आणि लसींचा पुरवठा अखंडित होत राहिला तर नियोजित वेळेत व लस वाया न जाता लसीकरण केले जाईल, असे आश्वासन डॉ. व्यास यांनी या पत्रात दिले आहे.