केंद्राने अंधारात ठेवल्यानेच राज्यात बोगस लसीकरणाचे रॅकेट
राज्यात, विशेषतŠ मुंबईत बोगस लसीकरणाचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणाचा एसआयटीमार्फत तपास सुरू आहे, पण केंद्र सरकारने राज्याला अंधारात ठेवल्याने बोगस लसीकरणाचा प्रकार घडल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आज केला.
या बोगस लसीकरणाची कारणे यावेळी नवाब मलिक यांनी दिली. ते म्हणाले की, लसीकरणाचा बोगसपणा होण्याचे मुख्य कारण म्हणजे खाजगी लोकांना व खाजगी हॉस्पिटल यांना लस वितरित करण्यात आली. त्याची माहिती राज्यांना देण्यात आलेली नाही किंवा डाटा राज्याला शेअर करण्यात आलेला नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
सुरुवातीपासून जर खाजगी लोकांना लस देत असताना राज्यांना त्याबाबतची स्पष्ट माहिती दिली असती तर नगरपालिका, महानगरपालिका आणि स्थानिक यंत्रणा त्यावर नियंत्रण ठेवू शकल्या असत्या आणि अशा प्रकारचा बोगसपणा झाला नसता असे नवाब मलिक म्हणाले.